वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ म्हणून राबवा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करा
अहिल्यानगर दि. १२ जून २०२५ – राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत चालू वर्षात राज्यात १० कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करत ही मोहीम लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवडी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, विभागीय वन अधिकारी, सचिन कंद, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, डॉ. एस.के.बांगर, जयहिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतूबदल याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या वृक्ष लागवडीमध्ये जिल्ह्याचा सहभाग अधिक प्रमाणात रहावा, यादृष्टीने वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात शाळांच्या आवारामध्ये उपलब्ध जागेनुसार वृक्ष लागवड करावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मियावाकीसारखे प्रयोग अंमलात आणावेत. बांधावर वृक्षे लावण्याबरोबरच तुतीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये शहरी भागांमध्ये माजी सैनिकांचा सहभाग घेण्याबरोबरच एनजीओ, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्यांनाही या उपक्रमामध्ये सहभागी करुन घेण्यात यावे. वृक्षांची केवळ लागवड न करता वृक्षांच्या संगोपन होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. सामाजिक वनीकरण विभाग तसेच इतर नर्सरीमधून रोपे उपलब्धतेचे नियोजन करावे. वृक्ष लागवडीचे जिओटॅग छायाचित्र काढून ते वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
उपवनसंरक्षक श्री. सालविठ्ठल म्हणाले, शासनामार्फत दरवर्षी ही मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक विभागाने लागवडीचे क्षेत्र व रोपाचे नियोजन करावे. पावसाळा सुरु झाला असून वृक्षांची लागवड तातडीने करण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीसदंर्भात तांत्रिक मदतीसाठी वनीकरण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.