शेतकर्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषि साहित्याचे वाटप उपक्रम महत्वाचा- विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम
राहुरी विद्यापीठ, दि. 13 जून, 2025 शेतकरी समुदायाला शेतीसाठी आवश्यक असणारी छोटी यंत्रे व अवजारे त्यामुळे त्यांचे कष्ट कमी होऊन, उत्पादकता वाढून शेती करण्याच्या शाश्वत पध्दतींना प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल कदम यांच्या देखरेखीखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि अभियांत्रिकी विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असलेल्या कन्सोरशिया रिसर्च प्रोजेक्ट, आयओटी सक्षम व सेंसर आधारीत अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून कृषि साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन नाळीद, ता. कळवण, जि. नाशिक येथे करण्यात आलेे होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनील कदम बोलत होते. याप्रसंगी संशोधन उपसंचालक तथा मृद व जलसंधारण विभागचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भाऊ गावित, नाळीद गावचे उपसरपंच श्री. काळू बागुल, संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे, वरिष्ठ संशोधन सहकारी इंजि. शुभम सुपेकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. भाऊ गावित यांनी विद्यापीठाच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्मार्ट इरिगेशन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून नाळीद गावातील 50 शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कृषि अवजारे, जैविक खते, जैविक औषधे व कृषिदर्शनी- 2025 या साहित्याचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. काळू बागुल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे तर आभार श्री. नंदन गावित यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नाळीद गावातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.