तंत्रज्ञानाचा प्रसार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावा – कुलगुरू डॉ. शरद गडाख
राहुरी विद्यापीठ, 17 जून, 2025 कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार क्लस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे होईल. यासाठी एक क्लस्टर निवडून तसेच एका पिकाची निवड करून त्या पिकाचे बियाण्यासह सर्व तंत्रज्ञान तेथील शेतकर्यांना पुरवावे लागेल. विद्यापीठाचे तंत्रज्ञान जलद प्रसारासाठी क्लस्टरचा उपयोग प्रभावी ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक खरीप 2025 चे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते.
यावेळी राज्याचे कृषि आयुक्त डॉ. सुरज मांढरे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के,अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर श्री. अजय कुलकर्णी, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक श्री. सुभाष काटकर व विभागीय कृषि सहसंचालक, पुणे श्री. दत्तात्रेय गवसाने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शरद गडाख पुढे म्हणाले की शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर उत्पादनात वाढ झाली पाहिजे. यासाठी उत्पादन खर्चात बचत करावी लागेल. तणनाशकाचा प्रभावी वापर करून खुरपणीवर होणारा खर्च वाचेल. त्यासोबतच मूल्यवर्धनाची साखळी तयार करावी लागेल. विद्यापीठाने तयार केलेले एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकर्याच्या उत्पादनात वाढ होईल व खर्या अर्थाने शेती शाश्वत होईल असे यावेळी ते म्हणाले.
कृषि आयुक्त डॉ. सुरज मांढरे आपल्या ऑनलाईन मार्गदर्शनात म्हणाले की आपल्याला शेती व शेतकर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. जोपर्यंत आपण शेतकर्यांच्या दैनंदिन जीवनात समाधान आणत नाही तोपर्यंत आपण यशस्वी झालो असे म्हणता येणार नाही. पर्यावरणातील चढ उतार शेतीवर विपरीत परिणाम करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्यांना कशी मदत करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. हॅकथोनमध्ये सहभागी झालेल्या प्रयोगशील व्यक्तींनी शेतीमध्ये नवनवीन संशोधन केले आहे. ते संशोधन विद्यापीठातील संशोधनासाठी कसे फलदायी ठरेल हे पहावे लागेल.
यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी सन 2025 मधील प्रसारित वाण, अवजारे व शिफारशी यांचा अहवाल सादर केला. डॉ. गोरक्ष ससाणे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विस्तार उपक्रम अहवाल 2025 चे सादरीकरण केले. यावेळी डॉ. उत्तम कदम यांनी खरीप पिकांचे कीड व्यवस्थापन, डॉ. रवींद्र गायकवाड यांनी खरीप पिकांचे रोग व्यवस्थापन व विद्यापीठ विकसित नाविन्यपूर्ण उत्पादन फुले सुपर बायोमिक्स, डॉ. नरेंद्र काशीद यांनी सुधारित भात पीक उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. श्रद्धा बगाडे यांनी खरीप हंगामाकरिता हवामान आधारित नियोजन, डॉ. सुरेश दोडके यांनी खरीप कडधान्य पीक उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. पवन कुलवाल यांनी कापूस पीक उत्पादन तंत्रज्ञान, तसेच महाबीजचे जालना येथील विभागीय व्यवस्थापक, डॉ. अनिल दुरगुडे यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापन, डॉ. मिलिंद देशमुख यांनी खरीप सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान, श्री. सुनील दौंड यांनी बियाणे उपलब्धता यावर मार्गदर्शन केले.
विभागीय खरीप अहवाल व विद्यापीठ शिफारशी प्रत्याभरण सादरीकरण श्री. अजय कुलकर्णी, श्री. सुभाष काटकर व श्री. दत्तात्रेय गवसाने यांनी केले. यावेळी झालेल्या खरीप हंगामाचे नियोजन व प्रत्याभरण व सुसंवाद कार्यक्रमात सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, सर्व संबंधित पीक विशेषज्ञ, विभागीय विस्तार केंद्राचे अधिकारी, जिल्हा विस्तार केंद्र व कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले.