जिल्हा उद्योग मित्र समितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अहिल्यानगर दि. ३०- जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीस महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योग अधिकारी अशोक बेनके, बालाजी बिराजदार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे प्रकाश गांधी, जागतिक बँक प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता अभय भांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यु ए बोरुडे, पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रवीण कुमार तेली, महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हरजीतसिंग वाधवा, आमी संघटनेचे अध्यक्ष श्री खाकाळ यांच्यासह उद्योग मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.पंकज आशिया म्हणाले, औद्योगिक क्षेत्रामधील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावीत. औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत स्टॉल तातडीने हटवण्यात यावेत. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलीस गस्त वाढवण्यात यावी. औद्योगिक क्षेत्राला पुरेशा प्रमाणात व विनाअडथळा विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. सनफार्मा ते निंबळक रस्ताचे कामही तातडीने करण्यात यावे. क्षेत्रामधील ड्रेनेजची स्वच्छता करण्यात यावी. त्याचबरोबर कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावत परिसर स्वच्छ राहील यादृष्टीनेही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ई-बस सुविधा सुरु करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना करत औद्योगिक क्षेत्रातील सोयी-सुविधांच्या अनुषंगाने विस्तृत आढावाही डॉ. आशिया यांनी यावेळी घेतला. यावेळी नेवासा व श्रीरामपूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, भूखंडवाटप, निवासी क्षेत्र, अग्निशमन यंत्रणा, राष्ट्रीयकृत बँकेची उभारणी यासह इतर विषयांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.