शेतकऱ्यांनी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करावा – संचालक, विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे
राहुरी विद्यापीठ, दि. 14 जून, 2025 कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरावे. विद्यापीठाने नवीनच विकसित केलेले फुले सुपर बायोमिक्स हे पाच उपयुक्त बुरशी आणि सहा उपयुक्त जिवाणू यांचे पावडर आणि द्रवरूप स्वरूपातील मिश्रण विद्यापीठाने विकसित केले असून शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
कृषि व किसान मंत्रालय भारत सरकार द्वारा, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तसेच देशाचे केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री. शिवराजसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान विकसित कृषि संकल्प अभियान अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आले. या अभियानाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सांगता समारंभ कृषी विज्ञान केंद्र, दहिगावणे येथे संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगावणेच्या कार्यक्षेत्रातील नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यातील 90 गावांमध्ये जाऊन कृषि शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांनी कार्यक्षेत्रात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांचे आधुनिक पीक उत्पादन तंत्रज्ञान तसेच शासकीय योजना यांच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र डॉ. आनंद चवई, डॉ. ए. व्ही. आतार, डॉ. बरय्या, डॉ. बसवराज पाटील, डॉ. एस. एस. कौशिक, श्री. अंकुश जोगदंड, तालुका कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माणिक लाखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नारायण निबे यांनी तर आभार श्री. प्रकाश बहिरट यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्री. नंदू पाटील, श्री. महेश म्हस्के, उप शेतकी अधिकारी श्री. आव्हाड, श्री. म्हस्के तसेच परिसरातील पुरुष आणि महिला प्रगतशील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.